आशुतोष गोवारीकर चा 'स्वदेस' हा माझा आवडता picure आणि त्यातले दसऱ्याच्या दिवशीचे ते 'पल पल हैं भारी' हे गीत तर सगळ्यात favorite.. रावणाने पळवून आणल्या नंतर रामाची वाट पाहत असलेल्या सीतेच्या मनातल्या भावना अतिशय सुंदर रीतीने मांडल्या आहेत जावेद अख्तर साहेबांनी.. आज दिवसभर ते गीत माझ्या ओठांवर गुणगुणत होते, त्यातला एक एक शब्द जसा मनाला स्पर्श करून जात होता.. लहानपणापासूनच रामायण हा आवडता विषय, दूरदर्शन वर येणारी मालिका म्हणजे एकदम 'not to miss show' असायचा. history मध्ये पण हेच शिकले, राम देव होता, सीता त्याची बायको जिने पत्नी धर्म निभावला आणि लक्ष्मणाने लहान भावाचे कर्तव्य पार पडले, पण जशी जशी मोठी होत गेले तसं तसं समजत गेले की जे घडले ते योग्य नव्हते, सगळ्या बाजूंनी विचार केला तर आज हि किती तरी प्रश्नांची उत्तरे मिळतच नाहीत..
आपल्या वडिलांनी दिलेले वचन पाळले जावे म्हणून रामाने एक आदर्श मुलगा म्हणून वनवासात जायला होकार दिला, भाऊ लक्ष्मणाने बंधुधर्म दाखविला आणि मग ते महान झाले, देवाच्या स्थानी जाऊन पोहोचले, इथेपर्यंत गोष्टी पटतात कदाचित,पण खर तर सीतेच्या बलिदानाचे कौतुक राम आणि लक्ष्मणापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे.. तो वनवास रामाच्या नशिबाचा भाग होता, पण आपण ही आता त्याच्या बरोबर जोडले गेले आहोत, ही आपलीही परीक्षा आहे हे स्वीकारून तिने रामाची साथ दिली.. तिचे अपहरण हा तिचा दोष नव्हता, रामाने युद्ध केले हा त्याचा संसार धर्म होता, अग्नीसमोर ७ फेरे घेऊन आपल्या पत्नीचे संरक्षण करण्याचे वचन होते जे त्याने पाळले, पण युद्ध जिंकून परत आणल्यानंतर अग्नी परीक्षा देऊनही त्या देवी सीतेच्या नशिबात सुख नव्हते.. इतिहासात कदाचित राम एक महान राजा असेलही, पण एका धोब्याचे बोलणे ऐकून आपल्या पत्नीने दिलेले सर्व बलिदान विसरून, तिला आपल्या आयुष्यातून दूर फेकून देणारा पुरुष माझ्यासाठी कधीच देवाच्या स्थानी असू शकत नाही. शेवटी तो ही एक अत्यंत सर्व साधारण मनुष्य निघाला, ज्याने आपली पत्नी आता पवित्र राहिली नाही या संशयाखाली हे पाउल उचलले, हेच सत्य आहे! कारण काहीही असो, पण सीतेबरोबर जे घडले तो अन्याय होता, ते पाप होते.. का त्या धोब्याची जीभ हासडून टाकून पूर्ण जगाला एक शिकवण नाही देऊ शकला राम? तो तर राजा होता ना, सहज शक्य होते त्याला हे.. पण कुठे तरी त्याच्या हि मनात असेलच ते शंकेच भूत, एक जीभ हासडली तर अजून १०० वळवळत परत येतील, त्या पेक्षा तिला सोडून देणे योग्य.. धर्म राहिला, तो महान झाला, देव बनला! सीतेची काळजी कशाला आणि कोणाला? सगळे आयुष्य त्याग करून वनवासात जायचे धाडस दाखवेल्या स्त्रीच्या वाटेला काय आले, दुःख, दारिद्र्य, एकटेपणा, अपवित्रता आणि २ बाळांची जबाबदारी? आणि एवढे सगळे होऊन सुद्धा राम देव झाला
आणि
स्त्री जातच युद्धाला जबाबदार असते ही म्हण मराठी मध्ये रूढ झाली, याची मला भारी गम्मत वाटते.. युगानुयुग आपण हे सत्य मानतोय आणि आपल्या पुढच्या पिढीलाही हेच शिकवतोय..
नैसर्गिक रित्या जरी स्त्री बाळाला जन्म देत असली तरी ही जबाबदारी दोघांची असते, संसार दोघांचा असतो, प्रेम दोघांचे असते! कोणी एक अश्या पद्धतीने ते अर्धवट सोडून जाणे चुकीचे आहे, हा त्या दुसऱ्या व्यक्ती वर अन्याय आहे. माझ्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे, इथे आजही स्त्रीवर सर्रासपणे अन्याय होतो, तिच्या भावनांना अगदी सहजपणे लाथाडले जाते, तिच्या बलिदानाला तिचे कर्तव्य समजले जाते.. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे! मला सगळ्यात जास्ती दुःख तर त्या लक्ष्मणाच्या पत्नीसाठी वाटते, तिचा काय दोष होता? तिने १४ वर्ष का म्हणून पती विरह सहन केला? का?? इतिहासात तर त्या बिचारीचे नावही नाहीये कुठे.. स्त्रीला consider करणे बंद केले गेले पाहिजे, ती एक स्वतंत्र्य व्यक्तिमत्व आहे हे विसरून चालता कामा नये..
आजही आपल्या सारख्या घरांमध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात या गोष्टी चालूच असतात, रोजच्या रोज ती स्त्री कधी मुलगी बनून, कधी बायको तर नंतर आई बनून स्वतःच्या आनंदाचा बळी देत असते.. हा imbalance थांबायला हवा, तिलाही त्या प्रत्येक आनंदाचा तितकाच अधिकार आहे जितका एका पुरुषाला आहे, थोडा जास्तीच पण कमी निश्तितच नाहीये.. आई वडिलांची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही, पण एका पत्नीचे स्थान ही आयुष्यात खूप महत्वाचे आहे हे कुठल्याही पुरुषाने विसरून जाता कामा नये, त्याच्या आयुष्याची खरी दोर त्या बायकोच्याच हातात असते, त्याच्या संसाराचा, वंशाचा, मुलाबाळांचा रथ तीच चालवत असते, पुढे नेत असते, कुठलीही अपेक्षा न ठेवता..
माझ्या मते, राम बनून जगण्यापेक्षा एक माणूस म्हणून जगला आणि आपल्या पत्नीला खऱ्या अर्थाने अर्धांगिनी बनवून जगवले तर तो खरा पुरुष... ते प्रेम आणि तो त्यांचा सुखाचा संसार..!